कोल्हापूर जिल्हास्तरीय लोकशाही दिनासाठी तक्रारी दाखल करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी
schedule17 Apr 26 person by visibility 120 categoryराज्य
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मंत्रालय, जिल्हाधिकारी व महानगरपालिका स्तरावर, दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त स्तरावर आणि तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर ‘लोकशाही दिन’ कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
तथापि, कोल्हापूर जिल्ह्यातील काही नागरिक महानगरपालिका कार्यक्षेत्राशी संबंधित तक्रारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये दाखल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. महानगरपालिका स्तरावरील तक्रारी या संबंधित महानगरपालिका कार्यालयाकडेच दाखल करणे आवश्यक आहे.
परिपत्रकानुसार, महानगरपालिकेशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी लोकशाही दिनाचे अध्यक्ष हे संबंधित महानगरपालिकेचे आयुक्त असतात. त्यामुळे कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्राशी संबंधित तक्रारी त्या त्या महानगरपालिका कार्यालयातच सादर कराव्यात.
जिल्ह्यातील नागरिकांनी कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्र वगळता इतर भागाशी संबंधित तक्रारीच जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये दाखल कराव्यात, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.